सध्या साखर कारखाने सुरु झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना उसाचा दर किती मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आता भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व किसन वीर-खंडाळा कारखान्याकडे गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळपाकरिता येणाऱ्या उसास प्रतिटन २ हजार ५०० रुपये एवढी पहिली उचल दिली जाणार आहे.
याबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील यांनी दिली. किसन वीर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे येणाऱ्या उसाला प्रतिटन २ हजार ५०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय झाला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील दैनिकामध्ये ‘किसन वीर’ची पहिली उचल प्रतिटन २ हजार ३५० रुपये प्रसिद्ध करण्यात आली होती.
या वृत्तामुळे ‘किसन वीर’ व खंडाळा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, असे आमदर पाटील यांनी म्हटले आहे. तसेच गळीत हंगामाच्या अखेरीस एफआरपीनुसार जो अंतिम दर निघेल त्यानुसारच किसन वीर कारखान्याचा अंतिम दर राहणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले आहे.
दरम्यान, ते म्हणाले किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे गळीताकरिता आलेल्या ऊसबिलाच्या पहिल्या पंधरवड्याचे बिल लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची माहितीही आमदार पाटील यांनी दिली. यामुळे हे पैसे लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
सध्या कारखान्यांमध्ये उसाच्या दरासाठी स्पर्धा सुरु आहे. मात्र शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. अनेक ठिकाणी कमी दर दिल्याने आणि काही ठिकाणी पैसे न दिल्याने शेतकरी नाराज आहेत. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे अजूनही मिळाले नाहीत. यामुळे शेतकरी नाराज आहेत.