वाशीम ः घरचे बियाणे (Home Grown Seed) वापरण्याबाबत कृषी विभागाने (Department Of Agriculture) शेतकऱ्यांमध्ये गेल्या दोन-तीन हंगामांपासून केलेल्या जनजागृतीचा परिणाम यंदा ठळकपणे दिसून आला आहे. या हंगामात जिल्ह्यात बियाण्याची मागणी (Seed Demand) सुमारे ३० हजार क्विंटलने घटली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांकडून कंपन्यांना मिळणारे सुमारे ४० ते ४२ कोटी रुपये वाचल्याचा दावा आता कृषी विभाग करीत आहे.
प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांनी दोन लाख ८५ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे तयार केल्याने याच बियाण्याची बीज प्रक्रीया करून लागवड केल्या गेली. त्यामुळे ८० टक्के बियाणे वापर हा घरगुती बियाण्याचा होता. नवीन बियाणे आणून पेरण्याचे प्रमाण ४० टक्क्यांनी घटले आहे. जिल्हयात यंदा केवळ ३८ हजार क्विंटल बियाण्याची खरेदी-विक्री झाली. राहिलेले सर्व बियाणे घरचेच वापरल्या गेले. यामाध्यातून ४० ते ४२ कोटी रुपये कंपन्यांना मिळण्यापासून रोखल्या गेले.
यंदा जिल्ह्यात संपूर्णपणे बीज प्रक्रिया केल्या गेल्यामुळे बियाणे उगवणीच्या तक्रारीही घटलेल्या आहेत. पेरलेले बियाणे उगवलेले असून दमदार वाढही होत आहे. आतापर्यंत या पिकाची स्थिती चांगली असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी पेरणीनंतर पाऊस उशिरा येऊनही बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्याने तग धरली. नंतर हे बियाणे जोमदारपणे उगवले. शिवाय शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड करताना बीबीएफ यंत्र, टोकण पद्धतीचा अधिकाधिक वापरसुद्धा केला आहे. अशा प्रकारे घरचे बियाणे वापर, बीजप्रक्रियेवर जोर दिल्याने सोयाबीन पिकाचा सुरुवातीच्या टप्प्यात काही खर्च कमी झालेला आहे.
घरचे बियाणे वापरावे यासाठी खासकरून सोयाबीन उत्पादकांमध्ये जनजागृती अधिक प्रमाणात करण्यात आली होती. याचा परिणाम यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुमारे ७० ते ८० टक्के बियाणे घरचेच वापरले आहे. जिल्हयात कृषी विभागाने तीन लाख सात हजार ५०० हेक्टरवर सोयाबीन पेरणीचे नियोजन केले होते. त्यासाठी दोन लाख ३० हजार ६२५ क्विंटल बियाण्याची आवश्यकता होती. यात बियाणे बदल ३३ टक्के गृहीत धरला तर सुमारे ७६ हजार क्विंटल बाजारातील बियाणे हवे होते.
क्रेडिट : अग्रोवन

