शेती क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना फुले संगम (केडीएस ७२६) या सोयाबीन वाणाबद्दल माहिती नाही असे फार कमी लोक आहेत. बहुदा हे लोक सोशल मीडिया पासून लांब असतील असे म्हणुया.
कदाचित हि गोष्ट काही जणांना फायदेशीर ठरते कारण शेतकऱ्यांचे काम म्हणजे मेंढरासारखे असे म्हटले तरी चालेल (मी स्वतः शेतकरी असल्याने ही गोष्ट मला पण लागु होते). त्याचे कारण असे की एखादा ट्रेंड जर आला तर काहीही विचार न करता सगळे जण तोच ट्रेंड फॉलो करतात.
जसे सध्या फुले संगमाच्या बाबतीत झाले आहे.
फुले संगम हे एक उत्तम वाण आहे व या वाणाबद्दल माझा वैयक्तिक असा काही रोष नाही. फक्त विषय हा आहे की जसे एखाद्या वाणाच्या चांगल्या गोष्टी असतात तसेच त्याच्या वाईट गोष्टी पण असतात हे शेतकरी विसरून जात आहे. उदाहरण द्यायचे झाले तर
१) फुले संगमला मध्यम व भारी जमिन लागते.
२) या वाणाला पाण्याचा ताण पडल्यास याचे फुलं गळु लागतात म्हणजेच हे वाण फक्त बागायती शेती साठी उपयुक्त आहे.
३) हे वाण परिपक्व झाल्यानंतर काढणीस उशीर झाला तर शेंगा तडकतात.
वरील गोष्टींचा विचार केला तर एम ए यु एस ६१२ (वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी) व एम ए सी एस १२८१ (आघारकर संशोधन संस्था पुणे) हे हलक्या जमिनीसाठी योग्य आहे. हे दोन्ही वाण पाण्याचा ताण सहन करू शकतात. फक्त फरक एवढाच आहे की १२८१ हे वाण ६१२ पेक्षा १५ दिवस उशिरा काढणीस येते व काढणीस उशीर झाला तरीही याच्या शेंगा तडकत नाहीत..
या बाबींचा विचार करता बागायती क्षेत्राकरिता फुले संगम हे वाण पोषक असुन जिरायत क्षेत्रात हे वाण घेतल्यास त्याची उत्पादकता घटु शकते असे म्हणु शकतो.
शेवटी इतकेच म्हणु इच्छितो की शेतकरी बांधवांनी शेतीकडे उद्योग म्हणून बघणे ही काळाची गरज आहे. केवळ ट्रेंड फॉलो न करता आपल्या क्षेत्रासाठी योग्य वाणांची निवड करावी कारण मेहनतीला बुद्धीची जोड मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार नाही.
साभार ; कृषीजागरण

