मागील १५ दिवसापेक्षा जास्त काळापासून राज्यात प्रचंड राजकीय उलथापालथिमुळे, याच कालावधीत सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ या गावात घडलेल्या एकाच कुटुंबातील ९ जणांच्या मृत्यूने सबंध महाराष्ट्र हादरला होता,तसेच या आत्महत्या असल्याचा निष्कर्ष प्रथमदर्शनी पोलिसांनी लावला होता, मात्र मागील ८/१० दिवसापूर्वी या आत्महत्या नसून गुप्तधनाच्या लालसेतून हे कुटुंब अंधश्रद्धा ना बळी पडल्याने एका भोंदू मांत्रिकाने हे हत्याकांड घडवून आणल्याचे उघड झाल्याने समाज सम्पूर्ण महाराष्ट्र किंबहुना संपूर्ण देशच या प्रकाराने हादरला.
मात्र राज्यात रोजच घडत असलेल्या राजकीय नाट्यचे मोठे आकर्षण समस्त समाज अन माध्यमांना असल्याने या गंभीर, भयानक हत्याकांडकडे अपवाद वगळता एक समाज म्हणून फारसे गांभीर्याने बघितले गेले नाही ही वस्तुस्थिती आहे. संवेदनशील समाजाला अस्वस्थ सुन्न करणाऱ्या,चक्रावून सोडणाऱ्या या हत्याकांड च्या निमित्ताने आज ही आपल्या समाजात लोभ आणि लालसेतून, अंधश्रधे तुन सुशिक्षित लोकसुद्धा कसे बळी पडत आहेत हेच प्रकर्षांने सिद्ध झाले आहे.
या भोंदू मांत्रिकाने या उच्च शिक्षित कुटुंबाकडून गुप्तधन काढून देण्याच्या आमिषाने लाखो रुपये उकळले,सदर कुटुंब या प्रकारात खाजगी सावकाराकडून पैसे उचलून कर्जबाजारी झाले,भोंदूबाबा ला आपण गुप्तधन काढून देऊ शकणार नाही याची स्वताला खात्री असल्याने त्याने तगादा वाढताच पैसे परत देण्याऐवजी थंड डोक्याने हे संपूर्ण कुटुंबच विषप्रयोग करून निर्घृणपणे संपवले.
या दुर्दैवी हत्याकांडात कुटुंबातील निष्पाप जीवांचाही नाहक बळी गेला.एक जागृत समाज म्हणून आम्ही अशा निर्घृण, निर्दयी प्रकाराकडे, अंधश्रद्धा कडे डोळसपणे, गंभीरपणे कधी बघणार ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. संत तुकाराम, संत गाडगेबाबा, जोतीबा फुले,आंबेडकर,राजर्षी शाहू, प्रबोधनकार ठाकरे, अशा थोर संत,समाजसुधारक यांनी आणि अगदी अलीकडच्या डॉ दाभोळकरासारख्या समाज सुधारकांनी चुकीच्या, कालबाह्य रूढी,परंपरा, अंधश्रद्धा यांच्या निर्मूलनासाठी आपली आयुष्य पणाला लावली मात्र पालथ्या घड्यावर पाणी या उक्तीप्रमाणे आम्ही कितपत बोध घेतला ? असा प्रश्न विचारण्यासारखी विदारक परिस्थिती समाजात निर्माण झाली आहे.
कोण भोंदू बाबा पैशाचा पाऊस पाडतो म्हणून लोकांना गंडा घालतोय,यातून मागे एक मोठे हत्याकांड घडले आहे,तर कोणी बाबा गुप्तधन काढतो म्हणून, तर कोणी बाबा महाराज हवेतून अंगठ्या,पेढे,खडीसाखर हातचलाखी ने भक्तासमो र काढुन आपण परमेश्वरी अवतार असल्याचा आव आणतोयअन भोळ्या भाबड्या समाजबरोबरच मोठमोठे राजकीय नेते, पुढारी,मंत्री,अनेक क्षेत्रातील सेलिब्रिटी समजल्या जाणाऱ्या हस्ती हजारोंच्या संख्येने अशा भोंदूबाबा पुढे नतमस्तक होताना दिसत आहेत
बहुतांश टी व्ही सिरीयल, सिनेमातून अशा अंधश्रद्धा वाढवणाऱ्या प्रकाराणा राजरोसपणे खतपाणी घातले जाते आहे,डॉ दाभोलकरासारख्या समाजसुधारकानी सागीतल्यानुसार आम्ही तर्कसंगत, तर्कनिष्ठ, आणि विज्ञान निष्ठ विचार आणि आचरणाचा स्वीकार केला तरी अंधश्रद्धा ना मोठ्या प्रमाणात आळा बसेल, मात्र आम्ही डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे विज्ञानाची सृष्टी स्वीकारली,मात्र दृष्टी स्वीकारली नाही परिणामी अशा अंधश्रद्धा चे स्तोम वाढतच आहे
एखादा बाबा जर चमत्काराणे हवेतून अंगठ्या काढून दाखवून स्वताला ईश्वरी अवतार समजू लागला तर मग आमचा देश अन समाज कर्जाच्या बोजाने दबण्याचे कारण काय ? अशा बाबांकडून त्याच्या भक्तांनी टनाणे लागेल तितके सोनें त्याच्याकडून चमत्काराणे काढून घेतले तरी देश कर्जमुक्त होईल ना ? मात्र हे घडणं केवळ अशक्यप्रायआहे कारण चमत्कार म्हणून हा बाबा हातचलाखी ने एखादी अंगठी,साखळी काढू शकतो टनाणे सोने तो निर्माण करू शकत नाही, इथंच तर्कनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ विचार दडलेला असतो, सोनं हवेतून तयार होत नसत, त्यासाठी सोन्याची खान लागते,मग भट्टीत ते सोन वितळवल जात मग सोनार त्यातून उच्चप्रतिच शुद्ध सोनं गाळून कलाकुसर करून अंगठ्या,आणि तत्सम सोन्याचे मौल्यवान अलंकार तयार करतो इतकं सार कष्ट, व्याप अंगठी तयार करण्यासाठी करावं लागतं ! अंगठी काय हवेतून निर्माण होणारी वस्तू आहे काय ? महाराजा ?
दुसरीकडे एखादा बाबा हातचलाखी ने एखादा पेन,खडीसाखर, किंवा काही किरकोळ छोट्यावस्तू काढून भक्तांना देतो अन भक्तसुद्धा अशा बाबाला ईश्वरी अवतार समजून त्याच्या कच्छपी लागतात,लुटले जातात,इथं साधा व्यवहारी तर्कनिष्ठ विचार समाजाकडून केला जात नाही की असा एखादा बाबा चमत्कारने पेढे लाडू प्रसाद खाद्यपदार्थ काढू शकला असता तर आमच्या देशात कुपोषण ने लाखो मुलं मृत्युमुखी पडली नसती,आमच्या शेतकऱ्यांना प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत प्रचंड कष्ट करून,घाम गाळून अन्नधान्य पिकवावे लागले नसते लाखोंच्या पटीत भूकबळी गेले नसते
एखाद्या बाबाच्या प्रसादवर मग देशातील अन्नापासून वंचित लाखो गरजूंची भूक भागली पाहीजे, मात्र हे केवळ अशक्य आहे, कारण हातचलाखी ने एखादा छोटा पदार्थ काढण्याचा तथाकथित चमत्कार करणे वेगळे आणि लाखो लोकांची भूक भागवणे वेगळे कारण लाखो लोकांना अन्न देण्यासाठी, त्यांची भूक भागवण्यासाठी त्या प्रमाणात धान्य व इतर पदार्थ,शिधा,मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर लागणार ही झाली वस्तुस्थिती अन विज्ञाननिष्ठ विचार फालतू हातचलाखी अन चमत्कार ने हे शक्य होईल काय ?दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की हे तथाकथित ईश्वरी अवतार समजणारे भोंदूबाबा हातचलाखी ने काहीतरी फुटकळ वस्तू ईश्वरी कृपा म्हणून काढून दाखवून प्रत्यक्ष ईश्वरालाच छोटा फुटकळ ठरवत आहेत याचे भान ना या बाबाना ना समाजाला कारण ईश्वर,देव म्हणजे या जगाचा निर्माता,नियंता,अशी समाजाची धारणा असते मग प्रत्यक्ष ब्रह्मांडनिर्माता जर प्रसन्न झाला तर काय एखादी फुटकळ अंगठी,पेढा,अन खडीसाखर देऊन भक्तांची बोळवण करील काय ?
त्याने जर खरोखरच दिले तर तो छप्पर फाडकेच देणार,मात्र हे तथाकथित अवतार,बाबा भोंदू प्रत्यक्ष देवालाच आपल्या लायकीवर आणून ठेवण्याचा अन त्याच्या नावाखाली स्वतःच्या तुंबड्या भरून समाजाला लुटण्याचा गोरखधंदा राजरोसपणे करत आहेत, अन बहुतांश समाज अशा प्रकाराणा बळी पडत आहे, राजकारणाच्या अतिरेकी, अनाठायी प्रभाव अन व्यसनाने अंधश्रद्धा, पर्यावरण अशा मानवी जीवनाच्या दृष्टीने महत्वाच्या मुद्याकडे आज राज्यकर्ते अन समाज या सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे हे खेदजनक वास्तव आहे
©शिवाजी पाटील ✒️
अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक जगन्नाथ राव पाटील फौंडेशन
फोटो क्रेडिट : alamy

