सेंद्रीयकर्ब म्हणजे वनस्पती , प्राणी व जीवाणूं ह्या सजीवांच्या अवयवांना कुजवून मोकळा झालेला त्यातील कर्ब होय. तसेच सेंद्रीय नत्र म्हणजे सुध्दा वनस्पती , प्राणी व जीवाणूंच्या अवयवांना कुजवून मोकळा झालेला त्यातील बंदीस्त नत्र किंवा नत्र स्थिरक जीवाणूंनी जमिनीत साठविलेला हवेतील नत्र होय. शेतातील पिकांना सर्वकष पोषणासाठी अतीआवश्यक असणाऱ्या जीवद्रव्य / ह्युमस निर्मितीसाठी काही निसर्ग नियम आहेत. जीवन द्रव्यात म्हणजे ह्युमस मधे जेव्हा १० किलो सेंद्रीय कर्ब जमा क़रायचा असेल तर त्यासाठी हया सेंद्रीय कर्बासोबत १ किलो सेंद्रीय नत्र जमा केला पाहीजे. तरच ते जीवन द्रव्यात साठवून राहतात, थांबतात. म्हणजेच. सुक्ष्म जीवाणू सेंद्रीय पदार्थांना कुजवून जी मोकळी झालेली अन्नद्रव्ये विशेषत: सेंद्रीय कर्ब व सेंद्रीय नत्र ही १o:१ हया परस्पर प्रमाणात ह्युमस नावाच्या बॅकेत जमा करायला हवा. ह्या _*सेंद्रीय कर्ब व सेंद्रीय नत्र ह्याच्या दाट मैत्रीच्या ह्युमसमध्ये जमा होण्याच्या किंवा एकमेकांशी बांधून घेण्याच्या परस्पर प्रमाणालाच कर्ब : नत्र गुणोत्तर ( C : N रेशो ) असे म्हणतात.*_
आम्ही विविध पिकात जेव्हा कडधान्य वर्गीय कर्बं : नत्र गुणोत्तर कमी असलेल्या म्हणजेच कर्ब : नत्र गुणोत्तर १० : १ या प्रमाणाशी मेळ असलेल्या व्दीदल धान्य पिकांचे काष्ठआच्छादन करतो. तेव्हा ह्युमस निर्मितीचा वेग अधिक असतो. याउलट एकदल पिकांच्या शरिरात मात्र नत्र कमी व कर्ब मोठया प्रमाणात असतो. एकदल पिकाच्या आच्छादनाचे कर्ब : नत्र गुणोत्तर १२० आहे ह्याचा अर्थ त्यात केवळ१ किलो सेंद्रीय नत्र आहे १२० किलो सेंद्रीय कर्ब. म्हणजेच, ह्युमस निर्मितीसाठी १२० किलो कर्ब उपयोगात आणायचा असेल तर ह्युमसनिर्मिती नियमानुसार १२ किलो नत्र पाहीजे. ह्याचा अर्थ हया १ किलो सेंद्रीय नत्रासोबत १२० किलो पैकी फक्त १० किलोच सेंद्रीय कर्ब ह्यूमस नावाच्या रिजर्व बँकेत जमा होईल व उरलेला ११० किलो सेंद्रीयकर्ब त्याच्याशी युती करायला सेंद्रीय नत्र उपलब्ध नसल्याकारणाने निसर्ग नियमानुसार जेथून आला तेथे वातावरणात प्राणवायूशी संयोग पावून कर्बाम्ल वायूचे स्वरूपात हवेत निघून जाईल.
आता हा महाग मोलाचा सेंद्रीय कर्ब जमिनीत साठलाच नाही तर जीवाणूंना तो कोठून मिळणार ? मग त्यांची संख्या व कुजनक्रिया कशी वाढेल ? मग पिकांना अन्न कसे उपलब्ध होतील ?
म्हणूनच., जर एकदल आच्छादनातील हा उरलेला ११० किलो सेंद्रीय कर्ब ह्युमसमध्ये साठवायचा असेल तर आणखी ११ किलो नत्र एकदल आच्छादनात असला पाहीजे. हा नत्र सजीवांच्या अवयवांच्या कुजण्यातून आलेला पाहीजे. युरियामधील नत्राला कर्ब व ह्यूमस स्वीकारत नाही. म्हणजे हा ११ किलो सेंद्रीय नत्र आपल्याला कडधान्यवर्गीय व्दीदल पिकांच्या अवशेषांना ( शरीराला ) एकदलवर्गीय अवशेषांसोबत कुजवून मिळवला पाहीजे. त्यासाठी एकदलामध्ये व्दीदलवर्गीय पिकांचे अवशेष मिसळायला हवे. त्याशिवाय कोणताही तरणोपाय नाहीच ! मग आम्हीं तर. कडधान्य पिकांचे भूस ( कुटार ) आच्छादनासाठी वापरणार नाही कारण ते सर्व आम्हीं आपल्या बैल, गायी, म्हैस इ. पाळीव गुरांना खाऊ घालणार… !
तर मग करायचे काय…. ?
मग ह्या कर्ब : नत्र (१०:१ ) समीकरणाच्या योग्य यशस्वीतेसाठी. विनासायास सतत उपलब्धतेसाठी आम्हांस एकदल पिकांमध्ये व्दीदल व व्दीदल मध्ये एकदल आंतरपिक पद्धतीने पेरणी करुन त्या आंतरपिकांनी केलेली पानगळ, फुल- कळयांची गळ, खोडगळ, काष्टगळ, फळगळ व मूळांचे जमिनीतील मोठे जाळे सतत जमिनीवर साठवून ह्युमस निर्मितीस आवश्यक सेंद्रीय नत्र सेंद्रीय कर्बाच्या प्रमाणात साठविला जाईल. त्यामुळे ह्युमस निर्मितीस्तव आवश्यक कर्ब : नत्र ( १०:१ )गुणोत्तरही साध्य होईलच.
त्यास्तव.,
वरील सर्व आशय आम्हीं सर्व निसर्ग शेती वारकऱ्यांनी काळजीपूर्वक समजावून घेऊन विविध पिक/ फळबागमध्ये आच्छादन करतांना केवळ एकदलवर्गीय आच्छादन न करता त्यात व्दीदलवर्गीय कडधांन्याचे आच्छादनही मिक्स करुन व आपली जमीन ह्युमस रुपी जीवनद्रव्यांने ओतप्रोत पहेलवान करण्यासाठी मिश्र ( एकदल+व्दिदल) लागवड करू, तरच कर्ब – नत्र गुणोत्तर ( C : N रेशो ) टिकून राहील..
क्रेडिट : शिवप्रसाद येळेकर