पुणे ः मॉन्सून (Monsoon) दाखल होऊन तब्बल साडेतीन महिने झाले आहेत. सुरूवातीच्या काळात कमी पाऊस (Rainfall) झाला तरी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांत मुसळधार झालेल्या पावसामुळे धरणे ओसंडून वाहत (Dam Overflow Due To Heavy Rain) आहेत. धरणांमध्ये आतापर्यंत तब्बल तब्बल १२६८.४५ टीएमसी म्हणजेच सरासरी ८८ टक्के उपयुक्त पाणीसाठा (Water Storage) झाला आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना भेडसावणारा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.राज्यात लहान, मध्यम आणि मोठ्या स्वरूपाची तब्बल ३ हजार २६७ धरणे आहेत. या धरणांची उपयुक्त पाण्याची क्षमता सुमारे १४३९.६९ टीएमसी एवढी आहे. त्यापैकी धरणांमध्ये आतापर्यंत सरासरी ८८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा सात टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्याची फारशी अडचण येणार नसल्याचा अंदाज आहे.जुलैमध्ये झालेला दमदार पाऊस आणि ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या पावसामुळे धरणांतील पाणीपातळीत वेगाने वाढ झाली. पश्चिम पट्यातील घाटमाथ्यावरही मुसळधार पाऊस कोसळला होता. लहान व मध्यम ऊर्ध्व पैनगंगा, गोसी खुर्द, निम्न वर्धा, हतनूर, खडकवासला, चासकमान, वीर, गुंजवणी, घोड अशी अनेक धरणे भरत आली. त्यामुळे पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. ऑगस्टमध्ये उजनी, जायकवाडी, कोयना, वारणा, मुळा अशी मोठी धरणे भरली. सप्टेंबरमध्ये अनेक धरणांतून विसर्गात वाढविण्यात आला.
राज्यात दोन्ही महिन्याची सरासरी पावसाने ओलांडली आहे. एक जून ते ४ सप्टेंबर या तीन महिन्यांत राज्यात सरासरीच्या ८३८.५ पैकी ९८३.३ मिलिमीटर म्हणजेच १७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. कोकणात पावसाने सरासरी गाठली आहे. उर्वरित राज्यात सरासरीच्या तुलनेने अधिक पाऊस पडला आहे. जून महिन्यात राज्यात सरासरी असलेल्या २०९.८ पैकी अवघा १४७.५ मिलिमीटर म्हणजेच ७० टक्के पाऊस पडला होता. मात्र, त्यानंतर ४ ऑगस्टपासून पुन्हा पावसाने बरसण्यास सुरूवात केली. सप्टेंबरमध्येही पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे महत्त्वाच्या गोदावरी, बाघ, कन्हान, वैनगंगा, बावनथडी, वणा, मुठा, भीमा, कोयना, कृष्णा, पंचगंगा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत.सध्या कोकण विभागातील धरणे ओसंडून वाहत आहे. कोकणातील १७६ धरणांत ११५.६६ टीएमसी म्हणजेच सरासरी ९३ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. यामध्ये भातसा, सुर्याधामनी, मोडकसागर, तानसा, विहार, तुलसी, मध्य वैतरणा, बारावे या धरणे भरल्याने धरणांतून विसर्ग सोडण्यात आला आहे. नाशिक विभागातील ५७१ धरणांत १७८.२८ टीएमसी म्हणजेच ८४ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. यामध्ये दारणा, गंगापूर, भंडारदरा, मुळा, गिरणा, हतूनर, वाघूर अशी सर्वच धरणे भरली आहेतपुणे विभागातील ७२६ धरणांत ४९२.६८ टीएमसी म्हणजेच ९१ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या विभागातील धरणांत ८५ टक्के पाणीसाठा होता. यंदा चांगलीच वाढ झाली आहे. विभागातील कोयना, राधानगरी, दुधगंगा, उजनी, भाटघर, पवना, पानशेत, खडवासला, घोड अशी जवळपास सर्वच धरणे भरली आहेत.
मराठवाड्यातील औरंगाबाद विभागात कमीअधिक पाऊस असल्याने ९६४ धरणांत २१३.१४ टीएमसी म्हणजेच ८१ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र, नाशिक विभागातून पाण्याची आवक सुरू असल्याने जायकवाडी धरणांतील पाण्यामध्ये चांगलीच वाढ झाली असून विसर्ग सोडण्यात आला येत आहे.विदर्भातील धरणांत पाणीसाठ्यात मोठी वाढ
अमरावती विभागातील ४४६ धरणांत १२४.७५ टीएमसी म्हणजेच ८६ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या धरणांत ८५ टक्के पाणीसाठा होता. यंदा जुलै, ऑगस्टमधील पावसामुळे ऊर्ध्व वर्धा, अरुणावती, इसापूर, बेंबळा, काटेपूर्णा, पेनटाकीळ, खडकपूर्णा या धरणांत चांगलाच पाणीसाठा झाला आहे. नागपूर विभागातील १४३.९२ टीएमसी म्हणजेच ८८ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामध्ये इरई, पंच तोडलाडोह, इटियाडोह, निम्नवर्धा या धरणांत पाणीसाठा वाढला आहे.
प्रकल्पनिहाय पाणीसाठा (टीमसीमध्ये)
प्रकल्प —संख्या — पाणीसाठा — टक्के
मोठे प्रकल्प — १४१ — ९६८.१३ — ९४
मध्यम प्रकल्प — २५८ — १६५.०१ — ८६
लघु प्रकल्प — २८६८ —१३५.२९ — ५९
एकूण — ३,२६७ — १२६८.४५ — ८८
सोर्स :ऍग्रोवन

