उस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले होते. आता ते चक्काजाम आंदोलन करण्याच्या तयारीत असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांना 29 नोव्हेंबर रोजी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे शेट्टी यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
राजू शेट्टी यांनी एकरकमी एफआरपी, ऑनलाईन वजनकाटे तसेच गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाचे दोनशे रुपये मिळावेत, वाहनधारक व मजूर महामंडळांमार्फत पुरवण्यात यावेत या मागण्यांसाठी स्वाभिमानीकडून एल्गार पुकारण्यात आला आहे. यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी उस परिषद घेतली आहे.
सरकारने दोनवेळा फसवणूक केली असून जर 29 नोव्हेंबरच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर 3 डिसेंबरला मोठ्या ताकदीने चक्का जाम करू असेही ते म्हणाले. राज्यातील एकही महामार्ग, राज्यमार्ग सुरु राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आता आरपारची लढाई असेल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी मागण्यांवर व्यापक बैठकीची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. बैठकीत निश्चितच सकारात्मक निर्णय घेऊ असेही आश्वासन दिले आहे. त्यांनी तातडीने सहकार मंत्र्यांच्या सहीने तातडीने पत्र मला पाठवले आहे, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.