या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनेक अस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड द्यावे लागले होते. खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे व अतिवृष्टीमुळे अनेक पिकांना मोठा फटका बसला होता आणि उत्पादनात घट घडून आली होती. निदान रब्बी हंगाम तरी सुखाचा जाईल या आशेने शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामाकडे आगेकूच केली मात्र रब्बी हंगामातही राज्यातील शेतकऱ्यांवर संकटांची मालिका कायम आहे.
नैसर्गिक संकटे कमी आहेत की काय म्हणून आता खत टंचाई आणि खतांचे अवाजवी दर वसूल करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले जात आहे. गत आठवड्यापासून वातावरणात मोठा बदल झाला, राज्यात थंडीचा उद्रेक बघायला मिळाला सोबतच दाट धुक्याची चादर ही वातावरणात कायम राहीली त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मोठा विपरीत परिणाम झाला.
आता कुठे वातावरणात अनुकूल बदल बघायला मिळत आहे, वातावरण आता निवळत आहे म्हणून रब्बी हंगामाच्या पिकांना वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्यांची गरज भासणार आहे. मात्र यातून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना आता पिकांसाठी खतांचे डोस देणे अनिवार्य ठरणार आहे. नाशिक जिल्ह्यातही एकीकडे वातावरण निवळले असून दुसरीकडे खतांच्या टंचाईचे कारण पुढे करून चढ्या दरात खतांची विक्री केली जात आहे तर काही विक्रेते आवश्यक खतासाठी दुसऱ्या खताची खरेदी सक्तीचे करत आहेत.
अनेक शेतकऱ्यांनी जुन्या खतांना नव्या खतांच्या किमतीत विक्री केले जातं असल्याचा आरोप केला आहे. पिकाच्या वाढीसाठी सध्या 10 26 26 या खतांची शेतकऱ्याद्वारे मागणी केली जात आहे. कृषी सेवा केंद्र चालक याच खतांची टंचाई असल्याचे शेतकऱ्यांना सांगत आहेत.

