राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आक्रमक पावित्रा घेतला. “शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने आज चर्चा घ्यावी. राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने तात्काळ सोडवावे.
सरकारने शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करावा,” अशी मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून पायऱ्यांवर उतरत जोरदार आंदोलन केले. अजित पवारांनी राज्य सरकारकडे कांदा खरेदी करण्याचाही मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी कांद्याच्या प्रश्न उपस्थित केला.
कांद्याच्या निर्णयाला परवानगी द्यावी. नाफेडनं कांदा खरेदीला सुरुवात केली तर दर स्थिर राहिलं, असे भुजबळ यांनी म्हंटले. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सभागृहात विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढायचा आहे की राजकारण करायचं आहे? असा सवाल फडणवीसांनी विरोधकांना विचारला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे कांद्याची खरेदी नाफेडने सुरू केली आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, राज्यात कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कांद्याला हमी भाव मिळावा म्हणून काळ नाशिक येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यानी आंदोलन करत बाजारसमितीचे कांद्याचे लिलाव बंद पाडले.
दरम्यान आता कांदा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह आमदार कांदा प्रश्नी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्यासह इतर आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर गळ्यात कांद्याच्या माळा आणि कापसाची टोपी घालून आंदोलन केले.