देशातील कापूस उत्पादन यंदा उद्दीष्टापेक्षा खूपच कमी राहिल्याचे आता स्पष्ट झाले. काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयने आता देशातील कापूस उत्पादन ३१३ लाख गाठींपर्यंत घटल्याचे स्पष्ट केले.
तर कापसाचा वापर आणि निर्यात कायम राहील, असं म्हटलं. त्यामुळे सध्या दबावात असलेल्या कापूस बाजाराला आधार मिळण्याची शक्यता निर्माण झाली.
देशातील कापूस उत्पादनात यंदाही मोठी घट झाली. याआधी अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने देशातील उत्पादन घटल्याचे स्पष्ट केले होते. युएसडीएने भारतातील उत्पादन यंदा ३१३ लाख गाठींवर स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला होता.
आता सीएआयनेही उत्पादन ३१३ लाख गाठींपर्यंत घटल्याचे सांगितले. गेल्या हंगामात देशात ३०७ लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते.
सीएआयने यापुर्वी देशातील कापूस उत्पादन ३२१ लाख गाठींवर पोचल्याचे सांगितले होते. मात्र नुकत्याच झालेल्या बैठकीत महाराष्ट्र आणि तेलंगणात यंदा उत्पादनात जास्त घट झाल्याचे सीएआयच्या सदस्यांनी स्पष्ट केले.
तेलंगणातील उत्पादनात आणखी तीन लाख गाठी तर महाराष्ट्रात दोन लाख गाठींनी उत्पादन आणखी घटले. हरियाना आणि कर्नाटकात प्रत्यकी एक लाख गाठ आणि पंजाब, तमिळनाडू मध्ये प्रत्येकी ५० हजार गाठींनी उत्पादन घटले. देशातील एकूण उत्पादनात मार्चमध्ये ८ लाख ५० हजार गाठींची कपात करण्यात आली.
देशातील कापूस उत्पादन घटलं पण बाजारातील आवक यंदा खूपच कमी आहे, असे काॅटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले. उत्पादनाच्या अंदाजात कपात केल्याने आता कापसाचा एकूण पुरवठा जवळपास ३५७ लाख गाठी होईल.
त्यामध्ये यंदाचे उत्पादन ३१३ लाख गाठी, १२ लाख गाठी आयात आणि आयात जवळपास ३२ लाख गाठींचा समावेश आहे.
कापूस वापराचा विचार करता यंदा देशातील कापूस वापर ३०० लाख गाठी होईल, असा अंदाजही सीएआयने व्यक्त केला. तर यंदा निर्यात काहीशी कमी होऊन ३० लाख गाठींवर स्थिरावण्याचा अंदाज आहे.
पुढील हंगामासाठीचा शिल्लक साठा यंदा गेल्यावर्षीपेक्षा कमीच राहील. पुढील हंगामासाठी यंदा जवळपास २७ लाख गाठी शिल्लक राहतील, असाही अंदाज सीएआयने व्यक्त केला.
काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने देशातील उत्पादनाच्या अंदाज घट केल्याने कापूस बाजाराला आधार मिळण्याची शक्यता निर्माण झाली. चालू महिन्यातील बाजारातील कापूस आवक वाढल्याने दरावर दबाव आला.
त्यामुळे दरपातळी सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपयांच्या दरम्यान आहे. पण आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

