उसाची शेती सध्या वाढत आहे. शेतकऱ्यांना उत्पादन वाढीचे शास्त्र सांगण्यासाठी शेतकरी परिसंवाद घडवण्यास सुरुवात केली आहे. या परिसंवादात प्रामुख्याने माती परीक्षणाचा मुद्दा बाजूला पडत आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित १०० टनांचा खताचा डोस सांगून जादा खते टाकली की जास्त उत्पादन येते. हे बिंबवलं जातं आहे. साहजिकच शेतकरी सवयीने शिफारशीपेक्षा जास्त खते टाकत राहतो.
शेतकरी फक्त खते जास्त टाकली की जास्त उत्पादन येते, अशा भ्रमात राहतो. मूठभर शेतकरी एकरी १०० टनापेक्षा जास्त उसाचे उत्पादन घेत असल्याचे पाहून सर्वच शेतकऱ्यांनी एकरी १०० टनांपेक्षा जास्त उत्पादन घ्यावे. यासाठी काही साखर कारखान्यांनी प्रयत्न चालू केले आहेत.
माती परीक्षणाविना शेतकरी खते देत राहिला तर जमिनीतील शिल्लक खतांचा व वरून देत असलेल्या खतांचा मेळ न जमल्यामुळे जमिनीचा पोत दिवसेंदिवस खराब होत जाणार आहे. आणि मग रासायनिक खतांमुळे जमिनी खराब होत आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीला पर्याय नाही, अशी ओरड चालू होते.
तेव्हा उत्पादन वाढीसाठी जादा खताची मात्रा आवश्यक आहे पण जमिनीत शिल्लक खतेही पिकांना उपलब्ध व्हावीत यासाठीही प्रयत्न व्हायला पाहिजेत. त्यासाठी उसाबरोबर कोणत्याही पिकाला खताची शिफारस करण्यापूर्वी जमिनीतील शिल्लक खत जाणून घेण्यासाठी माती परीक्षण महत्त्वाचे आहे.
यामध्ये काही शेतकरी यशस्वीही होत आहेत. एकीकडे एकरी २० टन ऊस उत्पादन घेणारा शेतकरी, तर दुसरीकडे एकरी १२० टनांपेक्षा जास्त उत्पादन घेणारे प्रयोगशील शेतकरी, असे दृश्य पाहायला मिळत आहे. असे असले तरी सरासरी एकरी ३८ ते ४० टनांपर्यंतच सर्व साधारण शेतकऱ्यांचे उत्पन्न असल्याचे साखर कारखान्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

