देशात मार्च महिन्यापासून सोयाबीनचे भाव दबावात आहेत. सोयाबीनने मागील दोन महिन्यांपासून ५ हजारांची पातळी ओलांडली नाही. कारण खाद्यतेल दरातील मंदीचा दबाव सोयाबीन बाजारावर येत आहे. खाद्यतेल स्वस्त झाल्यानंतर देशात आयात वाढली. खाद्यतेलाचे साठे तयार झाल्यानंतर सोयाबीनचे भाव दबावातच राहीले.
मागील काही महिन्यांमध्ये उत्पादन वाढून मागणी थंड असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेल, सोयातेल आणि सूर्यफुल तेलाचे दर पडले. रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरु असल्याने तेलाचे साठे पडून होते. पण निर्यातीबाबत तोडगा निघाल्यानंतर दोन्ही देशांनी कमी भावात सूर्यफुल तेलाचा साठा बाजारात आणला.
नव्या हंगामातील उत्पादनासाठे साठे खाली करण्याचंही उद्दीष्ट होतं. दुसरीकडे मागील दोन वर्षे देशात खाद्यतेलाचे भाव वाढले होते. त्यामुळे भारत सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात मोठी कपात केली.
दोन वर्षात ४० लाख टन कच्चे सोयाबीन आणि कच्चे सूर्यफूल तेलाची शुल्कमुक्त आयात करण्यासही परवानगी दिली होती. त्या निर्णयात आता बदल करण्यात आला. पण देशात खाद्यतेल आयातीचा लोंढा आला.
सर्वच खाद्यतेलाचे भाव जवळपास ४० टक्क्यांपर्यंत कमी झाले. सूर्यफुल तेलाची आयात वाढल्याने पहिल्यांदाच सोयाबीन तेल सूर्यफुल तेलापेक्षा महाग झाले. सहाजिकच सूर्यफुल तेलाला मागणी वाढली. याचा परिणाम सोयाबीन बाजारावर होत आहे.
खाद्यतेलाचा साठा वाढला
देशाच तेल विपणन वर्ष नोव्हेंबर ते ऑक्टोबर असे असते. चालू तेल वर्षात यंदा खाद्यतेल आयात २० टक्क्यांनी वाढली. यंदा पहिल्या सात महिन्यांमध्ये ९० लाख ५५ हजार टन आयात झाली. गेल्या हंगामात याच काळात ७५ लाख ४८ हजार टनांची आयात झाली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी झाल्यानंतर आयात वाढत गेली. त्यामुळे देशातील खाद्यतेलाचा स्टाॅकही गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे. १ जून रोजी देशात २९ लाख ४१ हजार टनांचा स्टाॅक होता. तर १ जून २०२२ रोजी हाच स्टाॅक २२ लाख ४६ हजार टनांवर होता.
मागील काही महिन्यांची आयातीची गती काहीशी मंदावली त्यामुळे स्टाॅक कमी झाला. नाहीतर एप्रिलमधील स्टाॅक जवळपास ३५ लाख टनांच्या दरम्यान होता.
मे महिन्यात सोयाबीन, सूर्यफुल तेल आयात वाढली
मे महिन्याचा विचार करता पामतेलाची आयात कमी झाली तर सोयाबीन आणि सूर्यफुल तेलाची आयात वाढली आहे. पामतेलाची आयात एप्रिलच्या तुलनेत १० टक्क्यांनी कमी होऊन मे महिन्यात ४ लाख ३९ हजार टनांवर आली.
तर सोयाबीन तेलाची आयात २१ टक्क्यांनी वाढली. मे महिन्यात भारतात ३ लाख १९ हजार टनांची आयात झाली. तसेच सूर्यफुल तेलाचीही आयात १८ टक्क्यांनी वाढून २ लाख ९५ हजार टनांवर पोचली आहे.

