सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलावाद्वारे होणारी कापूस खरेदी अंतिम टप्प्यात आहे. गेल्या पंधरावाड्यापासून कापूस दरात सुधारणा झाली आहे. सेलू बाजार समितीत बुधवारी (ता. ९) कापसाला प्रतिक्वंटल किमान ७७६५ ते कमाल ७६४० रुपये तर सरासरी ७७२५ रुपये दर मिळाले. शनिवारपर्यंत (ता. १२) कापूस खरेदी सुरू राहणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव राजीव वाघ यांनी दिली.
सेलू बाजार समितीत मंगळवारी (ता. ८) कापसाची १०९१ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७६२५ ते कमाल ७७२० रुपये तर सरासरी ७६६५ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. ७) कापसाची १३०१ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६४५० ते कमाल ७६८० रुपये तर सरासरी ७६०० रुपयेदर मिळाले. शनिवारी (ता. ५) १६८९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विटंल किमान ६२५० ते कमाल ७६३५ रुपये तर सरासरी ७५५० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. ४) १२७५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६४०० ते कमाल ७५७५ रुपये तर सरासरी ७५३० रुपये दर मिळाले.
गतवर्षीप्रमाणे यंदाही किमान १० हजार रुपये दर मिळतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवला होता. परंतु जानेवारीपासून सुरू झालेली दरातील घसरण कायम राहिली आहे. किमान दर साडेपाच हजार रुपयांवर तर कमाल दर सात हजार रुपयांपेक्षा कमी झाले होते. त्यामुळे कापूस उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. जुलैच्या अखेरच्या आठवड्यापासून कापसाच्या दरात सुधारणा होत आहे. परंतु आता बहुतांश शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक राहिलेला नाही.
कापूस बाजारात आशादायक चित्र आहे. मागील तीन दिवसांपासून कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली. देशातील बहुतांशी भागात कापसाचा कमाल भाव आता ७ हजार ५०० रुपयांच्या पुढे सरकला. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे भाव टिकून आहेत. राज्यात आज सेलू बाजारात सर्वाधिक ७ हजार ७०० रुपयांचा भाव मिळाला. Cotton
देशातील बाजारात चालू आठवड्यात कापूस भावात क्विंटलमागं ५०० रुपयांची वाढ झाली. देशातील बहुतांशी बाजारांमध्ये कमाल भाव आता ७ हजार ५०० रुपयांच्या पुढे सरकले. देशात कापसाची आवक सरासरीपेक्षा जास्तच आहे. एरवी बाजारात ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ३ ते ४ हजार गाठींच्या दरम्यान आवक होत असते. पण सध्या आवक १५ हजार गाठींच्या दरम्यान आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
देशात कापसाच्या सरासरी भावातही वाढ झाली. आज कापसाचा सरासरी भाव ६ हजार ७०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होते. देशातील सर्वच भागांमध्ये आता कापसाचे भाव वाढलेले आहेत. राज्यात सध्या सेलू बाजारात कापसाची आवक जास्त दिसते. तर सरासरी भावही जास्त आहे. आज सेलू बाजारात सरासरी ७ हजार ७०० रुपयाने कापसाचे व्यवहार झाले.
सरकीच्या भावातही वाढ झाली आहे. सरकीचे भाव सरासरी २ हजार ६०० रुपयांवर होते. पण मागील काही दिवसांमध्ये सरकीच्या भावात चांगली वाढ झाली. आज सरकीला प्रतिक्विंटल २ हजार ८०० ते ३ हजार १०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. सरकीचे भाव सरासरी ३०० रुपयांनी वाढले. यामुळे कापूस भावाला चांगला आधार मिळाला.
वायद्यांमध्येही कापसाचे भाव वाढले होते. सायंकाळा चार वाजेपर्यंत १४० रुपयांनी सुधारले होते. वायद्यांनी ५९ हजार ९०० रुपये प्रतिखंडीचा टप्पा गाठला होता. एका खंडीमध्ये ३५६ किलो रुई असते. देशातील कापूस वायदे मागील काही दिवसांपासून एका भावपातळीच्या दरम्यान आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस वायदे सायंकाळपर्यंत काहीसे वाढून ८५.४५ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते.
देशात आतापर्यंत कापसाची काहीशी पिछाडीवर आहे. त्यातच उशीरा झालेल्या लागवडी, ऑगस्टमधील पावसाचा खंड, पुढील काळात कमी पावसाचा अंदाज यामुळे कापसाची उत्पादकता घटण्याचा अंदाज आहे. तर आता सणांच्या पार्श्वभुमीवर कापसाला मागणी वाढत आहे. त्यामुळे कापसाच्या भावातील सुधारणा कायम राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला

