प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ३९८ पात्र शेतकऱ्यांनी अद्याप बँक खात्यास आधार क्रमांकाची जोडणी करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही.
जिल्हा प्रशासनाने वारंवार याबाबत जनजागृती करून देखील लाभार्थी शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिलेला नाही.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेस डिसेंबर २०१८ पासून राबविण्यात मान्यता देण्यात आली आहे. ही योजना १५ फेब्रुवारी २०१९ पासून सुरू करण्यात आली.
पात्रतेच्या निकषानुसार कुटुंबास पती-पत्नी व त्यांच्या १८ वर्षे वरील अपत्य ज्यांचे धोरण क्षेत्र २ हेक्टरपर्यंत आहे, ही मदत मिळणार आहे.
योजनेच्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तालुकास्तरीय समिती अध्यक्ष उपविभागीय अधिकारी तर ग्रामस्तरीय समितीचे प्रमुख तलाठी आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पात्र लाभार्थ्यास दरवर्षी ६ हजार रुपये असे २ हजार रुपयांचे प्रत्येकी तीन हप्ते दिले.
राज्यात सर्वाधिक लाभार्थी अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे ई-केवायसी प्रलंबित राहण्याची संख्याही राज्यात सर्वाधिक अहमदनगरमध्ये आहे.
५ लाख ९४ हजार ३६७ पात्र लाभार्थी
नगर जिल्ह्यात ५ लाख ९४ हजार ३६७ पात्र लाभार्थी शेतकरी आहेत. त्यापैकी ४ लाख ८५ हजार ९६९ म्हणजेच ८२ टक्के लाभार्थ्यांनी ई-केवायसीची नोंदणी केली आहे.
तर १ लाख ८ हजार ३९८ म्हणजेच १८ टक्के पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही.
ई-केवायसी अपूर्ण शेतकरी तालुकानिहाय आकडेवारी
नगर- ६ हजार २६८, नेवासे-८ हजार ७०९, श्रीगोंदे-९ हजार ३२३, पारनेर- ९ हजार २७३, पाथर्डी-८ हजार २२६, शेवगाव – ९ हजार २३, संगमनेर-८ हजार ८८९, अकोले-१० हजार ५३८, श्रीरामपूर-२ हजार ६२५, राहुरी-७ हजार ७१०, कर्जत-९ हजार ४४०, जामखेड-७ हजार १५५, राहाता-६ हजार २७, कोपरगाव-४ हजार १२० व इतर १ हजार ७२ असे एकूण १ लाख ८ हजार ९८ पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही.

