सध्या कांद्याची मातीमोल भावाने विक्री होत आहे. कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थीक संकटात सापडला आहे. रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून,अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, नैसर्गिक परिस्थितीशी सामना करत उत्पादन घेतले आहे. मजूरांपासून कांदा उत्पादन ते विक्री व्यवस्थापनातील घटक वाकूल्या दाखवतोय, आणि बळीराजा मात्र लाचार होऊन हताशपणे पहात आहे. कृषी प्रधान देशात बळीराजा संकटात सापडला असताना, सर्वच पक्षीय पुढारी मात्र मुग गिळून गप्प बसले आहेत अशी प्रतिक्रिया महा.राज्य कांदा उत्पा.शेतकरी संघटनेचे नेते श्री प्रमोद पानसरे यांनी ओतूर येथे व्यक्त केली आहे .
कांद्याचे थोडेफार बाजारभाव वाढल्यावर बजेट कोलमडले म्हणून बोंबा मारणारे उंदीर बिळातून बाहेर यायला तयार नाहीत.भाव वाढल्यावर कांद्यावर नजर ठेवणारे केंद्राचे भरारी पथक सध्या कोमात गेले आहे. कांदा हातात घेऊन दिवसभर ब्रेकिंग न्युज दाखवणारे सध्या कांद्याचा ज्युस पीत आहेत. दिवसभर एकमेकांवर चिखलफेक करणारे भोंगे, ढोंगे, सोंगे याबाबतीत कधी दखल घेणार ?. की शेतकरी आत्महत्यांची वाट पहात आहेत ???. उत्पादन खर्च प्रति किलो 17-18 रुपये येत असताना केंद्र सरकार नाफेडच्या वतीने 10-12 रुपये प्रति किलोने कांदा खरेदी करून शेतकर्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार करत आहे. अगदी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.आश्वासने पुढारी वाटून जातात….
स्वप्न शेतकर्यांचे लुटून नेतात….स्वार्थाचा डाव साधून व्यापारी स्वतःचे खिसे भरून घेतात…..
बळीराजाचे स्वप्न उत्तुंग भरारी घेण्याचे पंख निर्दयपणे छाटून जातात….
प्रमोद पानसरे, ओतूर
पुणे जिल्हा अध्यक्ष महा.राज्य कांदा उत्पा.शेतकरी संघटना

