पुणे : ‘‘जगातील विविध साखर उत्पादक देशांना मागे टाकत ब्राझिलनंतर सर्वाधिक साखर उत्पादन करणारा प्रदेश म्हणून यंदाच्या ऊस गाळप हंगामात महाराष्ट्र अग्रेसर ठरला आहे,’’ अशी माहिती राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
“यंदाचा गाळप हंगाम विविध बाबींमध्ये विक्रमी ठरला आहे. राज्याने १३८ लाख टन साखर तयार करून प्रथम क्रमांक मिळवला. १३४ कोटी लिटर इथेनॉल तयार केले. तसेच, १३२० लाख टन उसाची खरेदी करून शेतकऱ्यांना ४२ हजार कोटींपर्यंत एफआरपी देणारा हा हंगाम आहे,” असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
‘‘राज्यात कुठेही ऊस शिल्लक न राहता नियोजनाप्रमाणे १५ जूनला गाळप हंगाम संपला आहे. या हंगामात कोणतेही आंदोलन झाले नाही. मात्र, पुढील हंगामात आणखी जादा ऊस उपलब्ध होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पुढील हंगाम एक ऑक्टोबरपासून सुरू व्हावा, असा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविला जाणार आहे. पुढील हंगामासाठी ४०० नवे हार्वेस्टर येतील. त्यामुळे हार्वेस्टरची संख्यादेखील एक हजाराच्या पुढे जाईल,’’ असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
‘‘स्पर्धेमुळे साखर कारखाने मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण करीत असून त्यामुळे १२०० टनी कारखाने इतिहासजमा होत आहेत. यंदा कारखान्यांकडून १३४ कोटी लिटर्स इथेनॉलचा पुरवठा नोव्हेंबरपर्यंत होईल. त्यातून ९५०० कोटी रुपये कारखान्याला मिळतील,’’ असेही आयुक्तांनी सांगितले.
‘‘राज्यात यंदा १०० लाख टन ऊस नोंदणीकृत नव्हता. त्याचे गाळप झालेले आहे. मात्र, ऊसतोड वेळेत झाली नाही. मजुरांकडून अडवणूक झाल्याच्या ८० तक्रारी राज्यातून आल्या. ही समस्या टाळण्यासाठी ऊस नोंदणी अॅप तयार करण्यात आले आहे. त्याच्या चाचण्या पुढील १५ दिवसांत सुरू होतील. शेतकऱ्यांचा ऊस नोंदवून न घेतल्यास आयुक्तालय ते नोंदवून घेईल व नजीकच्या तीन कारखान्यांना तो गाळप वाटला जाईल,’’ अशी माहिती साखर आयुक्तांनी दिली.
‘..तर शिल्लक ऊस आयुक्तालयासमोर टाकू’
‘‘राज्यातील एकाही साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊस शिल्लक नसल्याचा दावा शासनाकडून केला जात आहे. ही वस्तुस्थिती असल्यास चांगले आहे; पण कुठे शिल्लक ऊस निघाला तर आम्ही तो साखर आयुक्तालयासमोर आणून टाकू,’’ असा स्पष्ट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी दिला.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची शेट्टी यांनी आयुक्तालयात बुधवारी (ता.१५) भेट घेतली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, “मराठवाड्यासह राज्यातील सर्वच भागातील उसाचे गाळप झाल्याचा दावा साखर आयुक्तालयाने केलेला आहे. मात्र, शिल्लक उसाअभावी शेतकरी अडचणीत येणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे.’’
source : मराठी टेक न्युज

