भारतभर उष्णतेच्या लाटेने नवनवे उच्चांक स्थापीत केले आहेत. तापमान मोजायला सुरुवात झाल्यापासुनचा हा सर्वात प्रखर उन्हाळा आहे, कदाचित भारतीय भुखंडावरच्या सर्व माणसांच्या आयुष्यातला हा सर्वात प्रखर उन्हाळा आहे. श्रीमंतांनी हा उन्हाळा आरामात काढला, ते तसे तो नेहमीच काढतात. उच्चमध्यमवर्गींयांनी एसीच्या बीलाची काळजी न करता आपल्याला शक्य तितके थंड ठेवले. मध्यमवर्गियांतल्या काहींकडे एसी होते पण वीजेच्या बिलाची धाकधूक होती, काही ठिकाणी एसी वा पंखेही लावण्यासाठी विजच नव्हती. रस्त्यावरच्या मजूरांनी, झोमॅटो-स्वीगी-अॅमेझॉनच्या डिलीव्हरी बॉईजनी, मराठवाड्यातल्या गरीब कोवळ्या मुलांनी आणि पत्र्याच्या घरात रहाणार्या कुटूंबांनी हा उन्हाळा नेमका कसा काढला आहे हे अजुनतरी विचारण्याची आपल्याकडे पद्धत नाही. महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी जोरदार उष्मालहरींनी आपला उच्छाद मांडला, चालतीफिरती माणसे उन्हाच्या तडाख्यांनी अचानकच मेली. दोन हीटव्हेव्हच्या मधल्या काळात लोकांना ओरीजनल उन्हाळ्याचा अनुभव आला आणि ह्या ओरीजनल उन्हाळ्याचा अनुभव काहींना आठवणीतून आठ्वला. काही ठिकाणी दोन उष्मालहरीमध्ये अक्षरश: गुलाबी थंडी पडली आणि काही ठिकाणचे सरासरी तापमान थोडीही उसंत न घेता दोन महिने रोज नवनवे उच्चांक स्थापीत करीत राहिले.
महाराष्ट्रातल्या लोकांची उन्हाळा सहन करण्याची शक्ती अफाट आहे. काही लोक उन्हाळा जेवढा प्रखर तेवढा पाउसही भरपूर असेही समिकरण मांडीत असतात. उन्हाळा, प्रखर उन्हाळा सहन करण्याइतपत सहनशक्ती अनेकांमध्ये आहे पण ती सर्वस्वी येणार्या पावसावर अवलंबुन आहे. उन्हाने हैराण झालेले हे दिवस पावसाने बदलतील हे सगळ्यांनाच ठाउक आहे, पाउस इतक्यातच येणार नसला तरी तो येणार आहे ह्यावर विनोद आणि ललिते चालू होती, पावसाला कधीकधी उशीर होतो, क्वचित अमळचं उशीर होतो हेही लोकांना माहित आहे. उन्हाळ्याची सहनशक्ती येउ घातलेल्या पावसाच्या आशेवर असते हे उपखंडातला प्रत्येक जीव जाणतो. त्यांच्या सहनशक्तीला बळ देण्यासाठी देशातल्या अनेक ठिकाणी मे महिन्यात वळवाचा पाउसही पडतो. न मागताच भर उन्हाळ्यात आलेल्या आम्रसरी दिवस दोन दिवसांसाठी थोडा उल्हास थोडी आशा देउन जातात. ह्यावर्षी देशातल्या अनेक ठिकाणी हा वळवाचा पाउस आलाच नाही. हिटव्हेव्हच्या दरम्यान दिवस दोन दिवस हवा थंड झाली होती खरी पण वळवाचा पाउस काही आला नाही. उन्हाळा मग अशक्य असहणिय झाल्यावर सगळ्यांना एकच प्रश्न पडला. कधी येणार पाउस? लवकर यावा म्हणजे झाले.
भारतात पावसाचे भाकित करणार्या ‘भारतीय मान्सुन विभाग’ (आयएमडी) ही सरकारी संस्था आणि ह्याच क्षेत्रात काम करणार्या स्कायमेट सारख्या खाजगी संस्थाच्या अहवालांकडे माध्यमांचे लक्ष गेले. गेल्या वर्षांत चेन्नईसारख्या ठिकाणी अचानक आलेल्या महापुरांविषयी पुर्वचेतावणी देण्यात आयएमडी अपयशी ठरली होती, पुरेसा डेटा अॅनालिसीससाठी उपलब्ध नसणे हे त्यामागचे मुख्य कारण असावे. गेल्याच वर्षी जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यात मान्सूनचा वेग वाढण्याचे आयएमडीचे भाकीतही असेच सपशेल फसले होते. ह्यावर्षी आयएमडीचे मान्सुनविषयक अंदाज जरा लवकरच बाहेर आले. दहा मे रोजी झालेल्या असनी आणि करीम ह्या जोडवादळांमुळे बंगालच्या उपसागरातली परिस्थीती बदलली आणि ह्या वादळांमुळे बंगालच्या उपसागरात तयार होणारी मान्सुनची शाखा वेळेआधी १६ मे रोजी पावसासाठी अनुकुल झाली. मान्सुनच्या अरबी समुद्रात मात्र अशी परिस्थीती नव्हती. बंगालच्या उपसागरातुन मान्सुन २७ मे रोजीच भारतात दाखल होईल असा आयएमडीने अंदाज मांडला. हा पाउस २७ ला जरी आला नसला तरी तो २९ ला आला. ह्याच सुमारास अरबी समुद्रातही मान्सुनच्या हालचाली सुरु होत्या आणि तिथेही २० तारखेच्या आसपास पावसाचे ढग जमा व्हायला लागले होते. ह्या इतक्या शक्यतेवर भारतात वेळेआधीच मान्सुनचे आगमन होईल असे भाकीत आयएमडीने केले, ह्या वर्षी १०२% पाउस होणार अशा हेडलाईन्सने वर्तमानपत्रांचे मथळे भरुन गेले. ३१ मे रोजी भारतीय माणूस ह्यावर्षी मान्सुन वेळेवर येणार आहे, मुबलक पडणार आहे, पेरणीसाठी ही उत्तम गोष्ट आहे अशा सार्वजनिक आशेत होता, परंपरागत संस्थेने आपल्या जुन्या आणि नवपरंपरांना जागून केलेले हे भाकीत कदाचित ठिकठाकही असावे. ह्याच दिवशी जगाच्या वेगवेगळ्या कोपर्यात क्लायमेट चेंजवर काम करणार्या शास्त्रज्ञांची मते मात्र विपरीत होती, त्यातल्या अनेकांना मान्सुन वेळेवर सक्रीय होईल आणि वेळेत बरसेल ह्यावर अजिबातच विश्वास नव्हता. वेळेवर नाही तर नाही पण उशीर तरी नेमका किती होईल? ह्या प्रश्नाचे उत्तर अवघड होते.
कमालीच्या गुंतागुंतीचा डेटा अॅनालाईज करतांना ‘मान्सुनला सक्रीय व्हायला दोन महिन्यांचा उशीर होउ शकतो’ अशी एक शक्यता समोर आली. उशीर आणि तोही दोन महिने, ही शक्यता अनेकांना खरच खुप घाबरवणारी होती आणि आहे. मान्सुनचे भाकीत वर्तवतांना पारंपारीक विज्ञानाची चौकट न वापरता पृथ्वीवरच्या सबंध हवामानाचा हरघडी बदलणारा डेटा अभ्यासुन आणि त्याचे शेअर मार्केटच्या डेटाप्रमाणे रोजच्या रोज अॅनालिसीस करुन त्यावरुन पावसाविषयी भाकीत करायला हवे असे राज भगत सारख्या डेटावर काम करणार्यांचे म्हणने आहे. असा डेटा अभ्यासून केलेल्या पावसांची भाकीते नेहमीच्या व्यवस्थेपेक्षा विपरीत येतात पण तिला थेट असे काही सरकारी वा प्रचारी लागेबांधे नसल्याने त्याची सत्यता वास्तवाच्या जास्त जवळ जाउ शकते. क्लायमेंट चेंजमुळे होणार्या बदलांचा डेटा अभ्यासून ह्यापुर्वी मान्सुनच्या आगमनाविषयी केलेले अंदाज बरोबर असले तरी त्याकडे माध्यमांचे लक्ष गेलेच असेल असे नाही पण ह्याच डेटाचा अभ्यास करुन मान्सुन कधीपासून परतीला लागणार आहे किंवा त्याची निष्क्रीयता कधी सुरु होणार आहे ह्याबद्दल गेल्या पाच वर्षांत केली गेलेली भाकीते खरी ठरली आहेत. मान्सुनचा पाउस कधी येणार ह्याबद्दल टिव्हीवरचे बोलके पोपटही अधूनमधून मिळेल त्या माहितीच्या आधारे जमेल तसे बोलत असतात पण पावसाच्या परतीविषयी कुणी बोलत नाही. पाउस आला तर आला पण तो संपायला लागतो तेंव्हा त्याचे विश्लेषण कुणाला करावेसे वाटत नाही. पाउस जसा सुरु होण्यावर काहींचे पोट अवलंबुन असते तसेच तो वेळेआधी गायब न होण्यावरही अनेकांचे पोट अवलंबुन असते.
दोन महिन्यातला एक महिना संपून गेला असला तरी उरलेला महिना पाउस न पडणे ही शक्यता अगदी आजही वैध आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांत काळे ढग तर अधनमधनं जमून येतायेत पण ते बरसत नाहीयेत. महाराष्ट्रात सर्वदूर पाउस होण्यासाठी अजुनही एक पुर्ण महिना लागू शकतो. ह्यात लांबलेला उन्हाळा, अवचितच येणार्या धारा आणि परत कडक उन हे माणसाच्या शरीराला फार चांगले नसेल. शहरी भागांतल्या बांधलेल्या धरणांच्या जलाशयात अजुनही पाणी असेल, पिण्याच्याच काय पण अंघोळीच्या पाण्याचीही काहीच ददात नसेल तरी सरसकट सर्व शहरांमध्ये ही परिस्थीती नाही, गावांमध्ये तर अजिबातच नाही. पाउस म्हणजे फक्त आंघोळीचे पाणी नाही तर ते शेतीत भाज्या व अन्न पिकविण्यासाठी लागणारे सर्वात महत्त्वाचे द्रव्य आहे. धरणाच्या पाण्यावर माणसे जगुनही जातील पण जंगलांना आणि जंगलातल्या प्राणीपक्ष्यांना पावसाचीच गरज आहे.दोन महिने उशीरा पडणारा पाउस हा कुणालाच परवडणार नाही, तो विनोदाचा विषय तर अजिबातच नाही.

