पाणीकर थकवला म्हणून ग्रामपंचायतीने नागरिकांना थेट न्यायालयाची नोटीस पाठवण्याची घटना घडली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. पाणीकराचा भरणा न केलेल्या 52 कुटुंबांना चंद्रपूरच्या सोमनपल्ली ग्रामपंचायतीने न्यायालयाची नोटीस पाठविली आहे.
गावाची लोकसंख्या एक हजार चारशे आहे. गावाला धाबा पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. असे असताना आता अचानक ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना न्यायालयाची नोटीस पाठवल्याने गावकरी चिंतेत आहेत.
दरम्यान, चार वर्षांचे 5 लाख 53 हजार 714 रुपयाचे पाणीकर या कुटुंबाकडे थकीत होते. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या महावितरण देखील वीज कट करत असताना आता या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
असे असताना आता महिन्यातून केवळ दहा ते बारा दिवसच नळ सुरू असतात असा आरोप सोमनपल्ली गावातील ग्रामस्थांनी केला आहे. नळ बंद असल्यावर गावकरी विहीर तथा बोरवेलचे पाणी भरतात.
यासाठी गावकऱ्यांना मोठी पायपीट करावी लागते, असा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे आता यावर काय निर्णय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या गावात मात्र या प्रकरणामुळे गावकरी चिंतेत आहेत.