स्वामिनाथन आयोगाच्या लागू करण्यात आलेल्या २०१ शिफारशीपैकी १७५ शिफारशी युपीए सरकारच्या काळात लागू करण्यात आल्या होत्या तर केवळ २५ शिफारशी भाजपा सरकारच्या काळात लागू करण्यात आल्या अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते आणि कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी दिली. त्याच बरोबर भाजपा सरकारने स्वामिनाथन आयोग लागू केला असल्याचा भाजपचा दावा पूर्णतः खोटा आहे अशी टीका केली .
हमीभावा संदर्भात A2+FL आणि C2 हे दोन फॉर्म्युले नेहमीच चर्चेत येतात. A2+FL मध्ये बी-बियाणे, खते, कीटकनाशके अशा सर्वच निविष्ठांवरील खर्च तसेच शेतकरी कुटुंबाची मजूरी समाविष्ट असते. तर C2 मध्ये बी-बियाणे, खते, कीटकनाशके अशा सर्वच निविष्ठांवरील खर्च, शेतकरी कुटुंबाची मजूरी तर असतेच शिवाय जमिनीचे भाडे, यंत्रसामुग्री व इतर भांडवली गोष्टींवरील व्याज यांचाही समावेश असतो. C2 हा सर्वसमावेशक फॉर्म्युला असून C2 च्या दीडपट हमीभाव देण्याची शिफारस स्वामीनाथन आयोगाने केलेली आहे.
सध्या केंद्र सरकार स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव देत असल्याचा गाजावाजा करत असले तरी प्रत्यक्षात मात्र स्वामिनाथन आयोगाच्या C2 फॉर्म्युल्यावर आधारित हमीभाव न देता, A2+FL फॉर्म्युल्यावर आधारित हमीभाव देत आहे आणि हीच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची फसवणूक आहे.
शेतकरी आंदोलनादरम्यान हमीभावाला कायद्यात्मक आधार देण्याची आग्रही मागणी राहिली. केंद्र सरकारने भलेमोठे शेतकरी कायदे केले, परंतु या तीन कायद्यांमध्ये हमीभाव हा एकच शब्द टाकण्याची नियत मात्र केंद्र सरकारने दाखवली नाही. उलट हमीभाव देणे अशक्य असल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. पाच राज्यांच्या निवडणुका बघून हमीभावासंदर्भात समिती स्थापन करणार असल्याचे केंद्र सरकारने सांगितले होते, परंतु निवडणुका होताच सरकारला या समितीचा विसर पडला आहे.
२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असल्याचं केंद्र सरकारने २०१७ मध्ये सांगितलं, परंतु ही घोषणा देखील आज हवेतच विरली आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून वर्षाला ६००० रुपये देत आहे, मात्र खतांच्या, डिझेलच्या किमती दुपटीने वाढवून, ही मदत व्याजासकट वसूल करत आहे. एकूणच केंद्र सरकार शेतकऱ्याच्या प्रति आत्मीयता असल्याचा दिखावा करत असली तरी वास्तवात मात्र केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अडगळीत टाकून शेतकऱ्यांची दिशाभूल केलेली आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करतानाही ‘खोटं बोल पण रेटून बोल’ ही आपली सवय मात्र कायम ठेवली .

