नाशिकमधील येवला तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. लागवड केलेल्या सोयाबीन पिकावर मोठ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसंच पिकाचे नुकसान होऊ लागल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
यंदा येवला तालुक्यात जेमतेम पावसाने हजेरी लावली. त्यानंतर येवल्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड केली. त्यानंतर आता पावसाने दडी मारल्याने आता आलेल्या सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.महागड्या औषधांची फवारणी करून देखील हातातोंडाशी आलेलं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे.
या भागातील अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी एक एकर सोयाबीनसाठी ३० ते ३५ हजार रुपये खर्च केला आहे. त्यातच पिकावर अळीचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांना पीक वाया जाऊन नुकसान होण्याची चिंता आहे.
“मी ११ एकरावर सोयाबीन लागवड केली आहे. त्यात पिकावर अळीच्या प्रादुर्भाव झाला आहे. अळीमुळे पिकाची चाळण होऊन नुकसान झाले आहे. औषधांची फवारणी केली तरी अळी कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे सरकार याकडे लक्ष देवून नुकसानग्रस्तांना मदत जाहीर करावी,” अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहेत.

