सध्या कांद्याचे बाजार पडले आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कांदे साठवण करण्याचे गोदाम म्हणून कांदाचाळ उभारण्यासाठी 1 लाख 60 हजार 367 रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.
यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. खरीप हंगामात कांदा काढला की, लगेच मागणी असल्यामुळे विकला जातो किंवा रांगडा हंगामातील कांदा साठविला जाऊ शकतो. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेची मागणी व निर्यातीची मागणी भागविण्यासाठी कांदा साठवणूक क्षमता वाढविणे गरजेचे आहे.
त्यामुळे ग्राहकांना माफक दरात व सातत्याने कांदा उपलब्ध होऊ शकतो. योग्य प्रकारे साठवण न केल्यास कांद्याला 45-60 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते, असेही रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे म्हणाले.
कांद्याचे कमीत कमी नुकसान होण्यासाठी कांद्याची शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी ‘कांदाचाळ’ च्या माध्यमातून कांदा पिकाची साठवणूक आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे दर आल्यावर शेतकऱ्यांना चार पैसे मिळतील.
दरम्यान, खरीप हंगामात कांदा काढला की, लगेच मागणी असल्यामुळे विकला जातो किंवा रांगडा हंगामातील कांदा साठविला जाऊ शकतो. मात्र खर्च जास्त असल्याने शेतकरी याकडे लक्ष देत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. http://www.hortnet.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन महाराष्ट्रातील इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांना कांदा चाळ अनुदानासाठी अर्ज करता येणार आहे.
संकेतस्थळावर अर्ज सादर केल्यानंतर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना पूर्वसंमती दिली जाते. या योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकरी महिला गट, शेतकऱ्यांचा गट किंवा स्वयंसहाय्यता गट, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था, शेतकऱ्यांचा उत्पादक संघ, सहकारी संघ तसेच नोंदणीकृत शेती संबंधित संस्था इ. लोकांना आणि संस्थांना मिळतो.

