मागील महिन्यात शंभरी पार गेलेला टोमॅटोचा दर आजच्या दिवशी सव्वादोन रुपये किलो एवढ्यावर येऊन ठेपला आहे. नाशिकच्या गिरणारे बाजार समितीत हिरडी गावातील भगवान महाले या शेतकऱ्याला अवघे सव्वादोन रुपये भाव मिळाला आहे. एकूणच नाशिकच्या गिरणारे, नाशिक, पिंपळगाव बसवंत या बाजार समित्या टोमॅटोसाठी प्रसिद्ध असून कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना टोमॅटो व्यापऱ्यांना देण्याची वेळी आली आहे. टोमॅटो उत्पादन घेण्यासाठी केलेला खर्च सोडा साध्या औषध फवारणीचा खर्च देखील सुटू शकत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हैराण झाला असून मेटकुटीला आला आहे. यापूर्वी मुसळधार पावसाने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला असतांना पाऊस उघडल्यानंतर टोमॅटोला चांगला भाव मिळेल या अपेक्षेत होता मात्र, तिथेही त्याच्या पदरी निराशाच आली आहे.
गिरणारे, पिंपळगाव बसवंत आणि नाशिक बाजार समितीत नाशिक जिल्ह्यातील शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी आणतात, विविध ठिकाणचे व्यापारी खरेदीसाठी येथे येत असतात.
मागील महिन्यात तर मुसळधार पावसाने शेतमालाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता, अतिवृष्टीपासून ज्यांचे पीक वाचले त्यांना दोन पैसे अधिकचे मिळाले होते.
दरम्यान, मुसळधार पावसाने शेतमालाचे झालेले नुकसान बघता, दिवाळीनंतर टोमॅटोला चांगला भाव मिळेल अशी शक्यता वर्तविली जात होती.
दिवाळी उलटून जवळपास पंधरा ते वीस दिवस उलटून गेले असून भाव वधारले नसून कोसळले गेले आहे, त्यामुळे कवडीमोल भावाने टोमॅटोची विक्रीहोत असून झालेला खर्चही निघत नाहीये.
शेतीचे वारंवार नुकसान होत असल्याने शेतीसाठी भांडवल कमी पडत आहे, त्यातच उधारीवर घेतलेली औषधे खते ही परत कशी करायची असा यक्ष प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडू लागला आहे.