मागच्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. दरम्यान आज(दि.11) तारखेपासून परतीचा पाऊस असेल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. परंतु मागच्या काल पासून सुरू झालेल्या पावसाने थैमान घालण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात मुंबईसह उपनगरात काल(दि.10) पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला होता. परंतु मुंबई परिसरात पाऊस झाला नाही परंतु कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पावसाने थैमान घातले. दरम्यान आज पहाटे पासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झालेला पाऊस अद्यापही सुरू आहे. काही भागात पावसाच्या पाण्याने रस्ते बंद झाले आहेत.
दरम्यान काल मुंबई परिसरात पाऊस झाला नसला तरी वातावरणात दमटपणा होता. यामुळे मुंबईकरांना अधिक अस्वस्थता जाणवत होती. हवामान खात्याच्या माहितीनुसार आज मंगळवारी आणि बुधवारीही मुंबईमध्ये यलो अॅलर्ट असून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात कालपासून झालेल्या पावसाने मात्र पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. याचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने सोमवारी दिलेल्या पूर्वानुमानानुसार मुंबईमध्ये मंगळवार आणि बुधवारी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्येही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातही पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील पावसाचे प्रमाण मंगळवारनंतर कमी होईल. पालघर, ठाणे, मुंबई येथे शुक्रवारी कोरड्या वातावरणाचीही शक्यता आहे. प्रणालीचा प्रभाव कमी झाल्यानंतर वातावरणीय घटक लक्षात घेऊन मग नैऋत्य मौसमी पावसाची माघारही जाहीर होऊ शकते, असा अंदाज आहे.